परवाच लोकलने कामावर जात होतो. काही कारणांमुळे गाड्या उशिराने धावत(?) होत्या. (मुंबईत राहणार्यांना याची सवय असतेच म्हणा.) गाडीतल्या सर्वांनाच कामावर जायला उशीर होणार असल्यामुळे कार्यालयातल्या परिस्थितीचा अंदाज बांधत सगळेच जण रेल्वेवर शिव्यांची लाखोली वाहत होते. (त्यात मीपण होतोच.) तेव्हा गर्दीत उभ्या उभ्या मनात विचार आला, जसं मुंबईला आणि मुंबईकरांना वेळ या वस्तूत फार रस आहे, तसाच भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आहेच की.
मग मी पाहिलेल्या शहरांबद्दल विचारचक्र सुरु झालं. पहिल्यांदा अर्थातच आठवली आमची मुंबई. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, मुंबईला वेळेचं महत्त्व फार. सकाळी ५.५५ चा अलार्मपासून ७.३२ ची ट्रेन, ८.१५ ची ८४८ नंबरची बस अशा नुसत्या घड्याळाच्या काट्यावर मुंबईकर नाचत असतात. २६.११ होवो किंवा अजून काही, या शहराला थांबणं मंजूरच नाही. (अपवाद- बाळासाहेबांची अंत्ययात्रा. तेव्हा मात्र मुंबईकर स्वतःहून थांबला होता.)
त्यानंतर येतं पुणे. पुणेकरांना सर्वात जास्त वेड कशाचं असलं तर तो म्हणजे त्यांचा बाणा. पुण्यात राहून जर तुमच्याकडे खास पुणेरी Attitude नसला, तर तुम्हाला तिकडे राहण्यास मनाई आहे. पुन्हा पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "पुण्यात राहताना तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान असायला हवा. तो कशाचाही असेल, पण तो जाज्ज्वल्य हवा." नुकतंच काही कारणामुळे ३ महिने पुण्यात रहायचा योग आला. तेव्हा तर प्रत्येक क्षणी ही गोष्ट पटली. अहो, संध्याकाळी ६.३० वाजता डेक्कन जवळच्या प्रचंड रहदारीत माझ्या गाडीसमोर तू तुझी गाडी घातलीसच कशी, म्हणून भर रस्त्यात आपापल्या गाड्या पार्क करून एक्मेकांशी तावातावाने भांडणारे पक्के पुणेकर पाहिलेत मी. तेव्हा पुणेकरांचं वेड पुणेरी बाण्यात असतं एवढं मात्र नक्की.
मुंबई आणि पुण्यानंतर येणारं मराठी शहर म्हणजे नागपूर. नागपूर, आणि सगळ्याच विदर्भाला "स्व" बद्दल अतिव प्रेम. मी, माझं यातच त्यांना रस असतो. आमचं नागपूर, आमच्या नागपूरची संत्री, आमच्या विदर्भातलं ताडोबा, आमची विदर्भी थंडी, आमचा नागपूरी वडाभात, आमचा वर्हाडी ठेचा... नागपूरकरांची ही आमचं ची यादी न संपणारी आहे.
हे तर झालं आपल्या महाराष्ट्राबद्दल. गेले एक वर्ष कामानिमित्ताने इंदौर ला होतो. त्या शहराचं आणि इंदौरकरांचं प्रेमाचं ठिकाण म्हणजे खाणं. अस्सल इंदौरी माणूस पट्टीचा खवय्या आहे. सकाळी सकाळी मिळणा-या खास इंदौरी पोह्यांपासून दाल बाटी, गजक, रबडी, अशा सगळ्या पदार्थांमुळेच इंदौर खवय्या शहर म्हणून प्रसिद्ध आहे. इंदौरमधील खवय्यांचं पंढरपूर म्हणजे सराफा चौराहा. या भागात सराफांची मोठमोठी दुकानं आहेत. संध्याकाळी ही दुकानं बंद झाली, की दुकानांसमोरील कट्ट्यांवर पदार्थांचे ठेले लागतात, आणि खवय्यांची पावलं आपसूकच तिकडे वळतात. सराफा ला मिळणारे सगळेच पदार्थ बेफाट. मग तो आलू बोंडा (बटाटा वडा) असो, रुमाली रोटी आणि पनीर माखनवाला असो, प्रसिद्ध दहिवडा असो (हा देताना तो ठेलेवाला एका द्रोणात दही घेतो, आणि वडा एकदम स्टाईलमध्ये १०-१२ फूट हवेत उडवतो आणि थेट दह्याच्या द्रोणात पकडून आपल्या हातात देतो.), केसर रबडी असो, खास इंदौरी मटका कुल्फी असो, चिकन रेशमी कबाब असो, सगळंच जाम भारी.
काही वर्षांपूर्वी भटकायला राजस्थानला गेलो होतो. तिकडे अजून वेगळंच. राजस्थानी माणसाचं प्रेम आहे ते त्यांच्या ऐतिहासिक ठेव्यांवर. राजस्थानात राजेशाही घराणी असल्यामुळे जवळपास प्रत्येक शहरात जुने मोठमोठाले राजवाडे आहेत. आणि नव्या पिढीनेसुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्यांना जपलंय. (महाराष्ट्रातले गड किल्ले आणि त्यांची अवस्था आठवतेय ना? खरं तर आपले गड नीट जतन केले तर राजस्थानी राजवाड्यांच्या तोंडात मारतील असले भव्य दिव्य आहेत. पण सरकारी अनास्था, आणि आपला निष्काळजीपणा.) आता बर्याचशा राजवाड्यांचे ३ भाग करून एक भाग त्या घराण्याला रहायला, एका भागात पंचतारांकित हॉटेल, आणि तिसर्या भागात म्युझियम अशी त्यांनी वाटणी केली आहे.
भारताचं नंदनवन असणार्या काश्मीर आणि काश्मिरी माणूस यांची कथा अजून वेगळी. काश्मिरी माणसाला काश्मिरच्या निसर्गाचं, दाल सरोवराचं, हजरतबल दर्ग्याचं, शंकराचार्य मंदिराचं वेड आहे. पण काश्मिरचे मुख्यतः ३ भाग पडलेत, एक पर्यटकांचं काश्मिर, एक दहशतवादाने होरपळणारं काश्मिर, आणि एक लेह लदाख. श्रीनगर, जम्मू, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग या भागातल्या लोकांचं विशेष प्रेम तिकडे जाणार्या पर्यटकांवर, कारण पर्यटनातूनच त्यांचं घर चालतं. अनंतनाग, पुंछ, कुपवाडा या दहशतवाद्यांच्या भागातल्या जनतेला स्वतःचा जीवच इतका प्यारा आहे, की त्यांच्यासाठी तेच प्रेमाचं ठिकाण आहे. (बरोबरच आहे हो, जान है तो जहान है.) लदाखला जायचा योग अजून यायचाय.
भारताची राजधानी दिल्ली. त्यांचं भलतंच. दिल्लीकरांना उगाचची नाटकं करण्यात रस आहे. (कॉलेजियन भाषेत आपण त्याला "फलवेगिरी" म्हणतो.) राजधानीच्या शहरात राहतात म्हणजे आपल्या डोक्यावर शिंगं आहेत, आणि फ**गिरी करणं हा आपल्याला सरकारने दिलेला हक्क आहे असं बहुधा यांना वाटत असावं.
ही यादी उत्तरेकडच्या राज्यांची. दक्षिणेच्या राज्यांचं बोलायचं तर त्यांचं सर्वात जास्त वेड आहे ते धर्मात. मी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या चारही राज्यात हिंडलोय. कुठेही गेलं तरी कुठल्या ना कुठल्या धार्मिक स्थळाचं दर्शन हमखास होतंच. हैदराबाद, सिकंदराबाद आणि कोस्टल कर्नाटक भागात बर्याच मशिदी आहेत, तामिळनाडूमध्ये गोपुरम आणि मंदिरं भरपूर, तर केरळात विपुल संख्येने चर्चेस. (बाकी धर्मस्थळंसुद्धा आहेत, पण त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात ती ती स्थळं जरा जास्त आहेत.)
दक्षिणेतलं हेवन म्हटल्या जाणार्या गोव्याबद्दल तर काही सांगायलाच नको. त्यांचं सगळं प्रेम काचेच्या बाटलीत भरलेल्या रंगीत पाण्यावर आहे. वास्कोच्या एका जेमतेम ७०-८० मीटर लांबीच्या बोळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे मिळून असणारे १४-१५ बार पाहिल्यावर तर मला याची अगदी खात्री पटली होती.
असो, आपापली वैशिष्ट्ये आणि खासियत घेऊन सगळेजण राहतायत. "जगी हा खास वेड्यांचा पसारा, मांडला सारा" हे खरंच आहे. प्रत्येकाची अदा निराळी, ढंग निराळे, तरीही आपण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतोय. हे मात्र फक्त भारतातच होऊ शकतं.